Tuesday 19 November 2013


II अनिरुद्ध पौर्णिमा II
किरातरुद्र

             प्रत्येक विश्वघटकाची निर्मिती चंडिकाकुलातूनच होते, लयही चंडिकाकुलातच होतो आणि निर्मिती व लय ह्यांमधील स्थिती व गती घडवून आणणारे, विश्वाला संचालित व अनुशासित करणारेही  चंडिकाकुलच आहे. प्रत्येक विश्वघटक चंडिकाकुलाच्या अधिकारक्षेत्रातच असतो. 
       चंडिकाकुलात आदिमाता चंडिकेसह ज्येष्ठ चंडिकापुत्र श्रीगुरुदत्तात्रेय, दत्तात्रेयांचेच प्रतिरूप असणारा महाप्राण श्रीहनुमंत, द्वितीय चंडिकापुत्र किरातरुद्र (सदाशिव),  किरातरुद्राची सहधर्मचारिणी शिवगंगागौरी आणि तृतीय चंडिकापुत्र परमात्मा (परमशिव - त्याची शक्ती आल्हादिनी व त्याचा अनुचर आदिशेष यांसह ) विराजमान असतात. 
               प्रत्येक मानवाची प्रार्थना येउन पोहोचते, ती या चंडिकाकुलाकडेच आणि त्या त्या मानवाच्या भक्तिनुसार त्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो, तोदेखील चंडिकाकुलाकडूनच.
               बाह्य आणि अन्तःसृष्टीचे संतुलन उचित बिंदूवर सांभाळणे हे  किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांचे महत्वाचे कार्य आहे. पावित्र्याला स्तंभ म्हणजेच आधार देणे, उचिताला प्रेरणा देणे आणि अनुचिताचे स्तंभन करणे हेच कार्य श्रद्धावानांसाठी हे दोघे सदैव करत असतात. 
               मानवाचे मन हे एक जंगल आहे. अहंकार, षड्रिपू आदी अनेक हिंस्त्र श्वापदे म्हणजेच दुर्वृत्ती त्यात वावरत असतात. त्यांचा सामना करण्यात मानवाची कुवत तोकडी पडते. प्रत्येकाला त्याचे स्वतःचे युद्ध एकट्यानेच लढायचे असते. 
               मानव जेव्हा सदगुरुतत्वाची (परमात्म्याची) भक्ती करू लागतो, तेव्हा त्याला क्षणिक मोहांवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य परमात्म्याकडून प्रदान केले जते. यातूनच या अरण्यात पर्वतशिखरांची निर्मिती होते. त्याचबरोबर परमात्म्याच्या श्रद्धावानांसाठी किरातरुद्र सक्रिय होतो आणि या मनोरूपी जंगलात  पर्वतशिखरांच्या अग्रावर राहतो. 
                हिंस्त्र श्वापदांची शिकार हा त्याचा छंद आहे आणि श्रद्धावानांना अभय देणे हि त्याची सहज लीला आहे. किरातरुद्र या जंगलातील सर्व श्वापदांचा म्हणजेच दुर्वृत्तींचा नाश करतो आणि श्रद्धावानाचा विकास घडवून आणतो. 
                प्रत्येक मानवास त्याचा समग्र विकास साधण्यासाठी चिंतन, शोध आणि अभ्यास यांची गरज असते. या तीनही तत्वांचा समतोल साधण्याचे सामर्थ्य श्रद्धावानांना त्रिपुरारी पौर्णिमेस त्रिपुरारी त्रिविक्रम परमात्मा, त्याची शक्ती आल्हादिनी, किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांच्याकडून सहजपणे प्राप्त होत असते. यासाठीच  त्रिपुरारी पौर्णिमेस पवित्र संकल्प करून तो पूर्ण होण्यासाठी किरातरुद्र पूजन आणि त्याची प्रार्थना केली जाते .